| |
पावसात डोंगर दर्यांत हिरव्यागार झालेल्या सॄष्टीचा आनंद लुटायला जाणार्यांची गर्दी उसळते. पण त्या हिरवाईचं बारीक निरीक्षण केल तर शिकण्यासारखंही खूप असतं. मुंबई विद्यापीठाच्या बहि: शाल शिक्षण विभागातर्फे बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या संरक्षित जंगलांमध्ये दर पावसाळ्यातल्या रविवारी निसर्गनिरीक्षणासाठी अभ्यास सहली, पदभ्रमणे आयोजित केली जातात. १९९४ पासून हा उपक्रम सुरू आहे. या सहलीसाठी कुणालाही कुणालाही प्रवेश मिळतो. जास्तीत जास्त पन्नास लोकांची तुकडी घेऊन वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि आयुर्वेद यांतील चार तज्ज्ञ या पदभमांस मार्गदर्शन करतात.
पावसाळ्यात उगवून आलेल्या वनस्पती, मोठे वॄक्ष, त्यांना लपेटलेल्या हिरव्या गच्च पानांनी नटलेल्या वेली, महावेली, विविध जातींची रंगबेरंगी भूछत्रे, उन्हाळ्यात झोप काढून पाऊस पडताच उगवून येणारे फुलणारे विविध प्रकारचे कंद, हिरव्या ओलाव्याच्या सोबतीने भराभरा वाढणारे अनेक प्रकारचे जीव, किडे, मजेदार सवयींचे कोळी, पतंग, फुलपाखरे आणि त्यांचे सुरवंट, गांधील माशी परिवारातल्या सशस्त्र माशा आणि पाठी लागणारे अन्नसाखळीतले पुढचे पुढचे दिवे, विविध पक्षी अशा अनेकविध निसर्गाशी ओळख करून देणारे हे पदभ्रमण असते. जीववैविध्य आणि त्याचे माणसासाठी असणारे महत्व हे जेव्हा वनस्पतींचे उपयोग समजतात तेव्हाच खरे वाटते. म्हणून आयुर्वेदाने जाणलेले वनस्पतींचे उपयोगही जोडीनेच सांगितले जातात.
या पदभ्रमांचे मार्गदर्शन करायला वैद्य श्री. द. जळूकर, डॉ. सी. एस. लट्टू, डॉ. रंजंन देसाई, डॉ. संजय भागवत, डॉ. चंदा रेगे, डॉ. केदार गोरे, श्री. आनंद पेंढारकर हे तज्ञ असतात. बोरिवली राष्ट्रीय उद्यानाचे महत्व मुंबइ शहरासाठी अनन्यसाधारण असे आहे. असे म्हटले जातेच. शहराची तहान भागवणारे जलाशय या संरक्षित जंगलामुळेच सुजल आहेत. गेल्या दहा वर्षात या अभ्यास सहलींचा लाभ सुमारे दोन हजार लोकानी घेतला. यात महाविद्यालीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी त्याचे पालक, मित्रामित्रांचे गट, मैत्रिणींचे गट, ज्येष्ठ नागरिक, औषध व्यवसायात काम करणारे लोक अशा विविध लोकांचा त्यात सहभाग होता. पाहिलेल्या वनस्पतींची शास्त्रीय नावे, कुलनामे, स्थानिक नावे असलेली यादीही विभागातर्फे सहभागी लोकांना दिली जाते.
निसर्गाचा अभ्यास आनंदमय, अविस्मरणीय ठरु शकतो याचे प्रत्यंतर या पदभ्रमणातून मिळतो. |